औंध : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दाखल घेऊन येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे त्यांना पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे भारतीय साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांचा जीवनप्रवास अनेक साहित्यिक, कवी, लेखकांना व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून साहित्य, कामगार व शिक्षण क्षेत्रातील प्रतिभावंतांना दर वर्षी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे सन्मानित केले जाते.
डॉ. बुरुंगले यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांनी अनेक सुधारणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना, तसेच विद्यार्थिनींचे अद्यावत वसतिगृह आणि त्यांच्या सांस्कृतिक जडण-घडणीसाठी डॉ. बुरुंगले यांनी विशेष मेहनत घेतली. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाविद्यालयाचे काम सर्वसामान्य व बहुजन समाजतील मुलांच्या कल्याणासाठी करत आहेत. डॉ. बुरुंगले यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या समारंभासाठी डॉ. यशवंत मनोहर, डॉ. गिरीश गांधी, रामदास फुटाणे, बाळासाहेब थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ पुणे येथील भांडारकर सभागृहात संपन्न झाला. त्यांना मिळालेल्या पूरस्काराबद्द्ल औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. अतुल चौरे, व प्रा. नंदकुमार उदार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.